सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 17 February | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 9
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 17 February | Gondavlekar Maharaj Pravachan

१७ फेब्रुवारी

नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे ।

मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही ; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते.

संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते, त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते. संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर ‘आपण याने निष्पाप होऊ’ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते.

साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही; साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे; म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झाले, निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वांभूती भगवद्भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे नि:स्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहात नाही, म्हणून द्वैतप्रचीती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेदप्रचीती येते. ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात, आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते.

48. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User